कात्रजमधून खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका


 पुणे : कात्रज भागात ७० लाखांच्या खंडणीसाठी भाडेकरुने १२ वर्षाच्या शाळकरी मुलाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी घडली. शाळकरी मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. त्यानंतर कात्रज परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अपहरणकर्ते तरुणाला लोणावळ्यातून सोडून पसार झाले.

महाविद्यालयीन तरुण कात्रजमधील संतोषनगर भागात राहायला आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यानंतर तरुणाच्या मोबाइल क्रमांकावरून आरोपींनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मुलाला जिवंत बघायचे असेल तर त्वरीत ३० हजार रुपये पाठवा, अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली. पोलिसांकडे तक्रार करू नका. पैसे दिल्यानंतर तासाभरात मुलाला सोडण्यात येईल, अशी धमकी त्यांनी दिली.मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तांत्रिक तपासात तरुण लोणावळ्यात असल्याचे निष्पन्न झाले. मध्यरात्री पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहोचले. त्यांनी या तरुणाची सुटका केली असून त्याला पुण्यात आणले आहे. तरुणाची पोलिसांकडून चैाकशी करण्यात येत आहे.

शाळकरी मुलाचे अपहरण प्रकरणात एकास अटक

कात्रजमधून शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. मुलाचे अपहरण भाडेकरूने केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी राजेश शेलार याला पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरातून ताब्यात घेण्यात आले.