हिंदी मराठी पत्रकार संघा द्वारे आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

       



 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधत मलकापूर येथील हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने दि.13 ऑगस्ट पासून मलकापूर शहरासह तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार दि.७/१०/२०२३ रोजी पंचायत समिती मलकापूर येथील हाॅलमध्ये मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 या कार्यक्रमासाठी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री. विलास पाटील साहेब, मलकापूर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री.संदीप काळे साहेब, समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष मा. श्री.अशांतभाई वानखेडे, हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील, निवासी नायब तहसीलदार मलकापूर मा.श्री.गोविंद वाघ,  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते मा.श्री.बाळासाहेब दामोदर, यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम उपस्थित प्रमुख अतिथींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आचार्य बाळकृष्ण जांभेकर , प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्ल्यार्पण केले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 दि.13 ऑगस्ट पासून मलकापूर शहरासह तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी या परीक्षांचा अनुभव व्हावा व विद्यार्थ्यांमध्ये यासारख्या परीक्षांची भीती न राहता गोडी निर्माण व्हावी हा या परीक्षा घेण्या मागचा हेतू होता. त्यासाठी तालुक्यासह शहरातील विविध शाळांमधील जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यात आली. त्यामधील शहर विभागातील सात शाळा, महाविद्यालयांच्या  प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार, तृतीय पुरस्कार तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे वितरित करण्यात आली. सदर परीक्षेमध्ये उल्लेखनीय प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांना "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन" पुरस्कार देऊन  मान्यवरांच्या हस्ते  गौरवण्यात आले.

यावेळी मलकापूर शहर पो.स्टे.चे ठाणेदार श्री. विलास पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या परीक्षेचे महत्त्व पटवून दिले या सोबतच त्यांनी या माध्यमातून विद्यार्थिनींना शाळा कॉलेज करत असताना काही असामाजिक तत्त्वांकडून छेडखानीचे किंवा त्रास देण्याचे प्रकार घडत असल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. तसेच मलकापूर ग्रामीण पो.स्टे.चे नविनच पदभार घेतलेले ठाणेदार श्री. संदीप काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्पर्धा परीक्षांचे महत्व पटवून देत काही महत्वपूर्ण विषयांची माहिती दिली. तसेच या परीक्षांचे आपले अनुभव देखील त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  सांगितले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग तसेच पालक वर्ग ही त्यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेलेला दिसला.

प्रमुख अतिथी भाई अशांत वानखेडे यांनी  विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. यानंतर बाळासाहेब दामोदर यांनी देखील मार्गदर्शन केले.

   सदर कार्यक्रमात श्रीकृष्ण तायडे, सतिष दांडगे, उल्हास शेगोकार, धर्मेशसिंह राजपूत, अजय टप, विनायक तळेकर, सै.ताहेर, शे.जमील पत्रकार , प्रदीप इंगळे, अनंता दिवनाले,  अनिल झनके, मयुर लढ्ढा ,  नितीन भुजबळ, प्रा प्रकाश थाटे, अनिल गोठी, दीपक इटनारे, करन झनके,श्रीकृष्ण भगत,समद कुरेशी, इलाई बक्श,  इ.सह शहरातील गणमान्य पत्रकार बंधु उपस्थित होते.