पाच महिन्यात सोयाबीनचे दर १२०० रुपयांनी घसरले, खरीपाच्या तोंडावर शेतकरी हतबल


प्रतिनिधी, सदशिव काकडे

       लातूर : सध्या मे महिना मध्यावर आला असुन शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामाचे वेध लागले आहेत.  मात्र गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांचे पिवळं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे दर १ हजार २०० रुपयांनी कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातच वाढलेले डीझेलचे भाव यामुळे पेरणीपूर्व मशागतही महागली आहे.

        बहुंताशी पावसावर व चार महीन्यात येणारे नगदी पिक म्हणुन सोयाबीन पिकाकडे पाहीले जाते. सोयाबीनला गेल्या तीन वर्षांपासून बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढलेला दिसत आहे. मागीलवर्षी एप्रिल महिन्यात सोयाबीनला सरासरी ७ हजार रुपयांचा भाव मिळत होता. तर गेल्या खरीपाच्या काढणीच्या वेळेला क्वींटलला ६ हजारांपर्यंतचे दर मिळत होते.

        सध्या सोयाबीनला ४ हजार ८०० पर्यंतचे बाजार भाव आहेत. गेल्या पाच महिन्यात त्यामध्ये जवळपास १ हजार २०० रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.  डिझेलचे वाढलेले भाव, वाढलेली मजुरी, विज बिल, रासायनिक खतांचे वाढलेले दर, रासायनिक औषधे यामुळे, सोयाबीनला मिळत असलेला दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी व तोटका असल्याचे सिद्ध होत आहे. असे असले तरी यावर्षी रासायनिक खतांच्या भाव वाढीबरोबर सोयाबीन बियाणे बॅग मागे ४०० ते ५०० रुपयांची भाव वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

        जून महिना तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांकडून खरिपाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. पावसाळा कसा असेल? बियाणे खते डिझेल यांचे भाव काय राहतील? परतीच्या पावसात नुकसान होईल का? पिक तयार झाल्यानंतर पुढच्या सीजनला सोयाबीनचे भाव काय असतील? असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी वर्गाला सतावतांना दिसत आहेत. सध्या बाजारपेठेत सोयाबीनची विक्री किंमत घसरली असली तरी याच बाजारपेठेतून अधिकच्या किंमतीने बियाणे व खते खरेदी करुन शेतकऱ्यांना पेरावे लागणार असल्याचे चित्र आहे.

             महाबीज महामंडळाने सोयाबीन बियाण्यांचे दर जाहीर केलेले असून 30 किलो सोयाबीन बॅगची किंमत 3000 रुपयांच्या जवळपास राहणार आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन 4800 रुपये क्विंटल ने विकावे लागणार असून बियाणे 10000 रुपये क्विंटल ने म्हणजेच जवळपास दुप्पट किमतीने खरेदी करावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यांमुळे ऐन खरिपाच्या तोंडावर सोयाबीनला नसलेला भाव व सोयाबीन बियाण्यांचे दुप्पटीने वाढलेले भाव अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असून शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.