प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी
ओझर :- निफाड तालुक्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हयात पाहणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसगट पंचनामे करून तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. चांदोरी येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या समवेत बाळासाहेब आहेर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. चांदोरी येथील कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्ष बागेसह कांदा, गहू व भाजीपाला या पिकांचीही यावेळी पाहणी करत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रूपये प्रति क्विंटल अनुदान देवून थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे तरीही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसून डिसेंबर महिन्या मध्ये जाहीर केलेली मदत अद्याप पर्यंत शेतकरी बांधवांच्या पदरात मिळाली नसल्याची टीका करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडले.
यावेळी त्यांच्या समवेत निफाडचे मा. आमदार अनिल कदम, तालुकाप्रमुख सुधीर कराड, चांदोरीचे सरपंच विनायक खरात, माजी सरपंच संदिप टर्ले, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती जाधव, सुलभा पवार, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, बिडीओ संदीप कराड, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढेमसे, सोमनाथ बस्ते, संजय भोज, दौलत टरले, प्रविण कोरडे, संजय कोरडे, रवी आहेर, विष्णु कोरडे, अमर आहेर, अभिजित शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.